Showing posts with label bhatkanti. Show all posts
Showing posts with label bhatkanti. Show all posts

Sunday, March 29, 2020

प्रवास अलिबागचा


बरेच दिवस झाला आमचा अलिबागला जाण्याचा प्लान फसत होता, पण यावेळी मात्र  जे कोणी कोणी सोबत होते त्याचासोबतच प्रवास करण्याचं ठरल. मी , तन्मय, आणि सचिन ऑफिस मधूनच थेट गेट वे ऑफ इंडिया  गाठली आणि कल्याण वरून ओमकार आणि लहू आले. सकाळची मांडवाला जाणाऱ्या पहिल्या बोटीने आमचा अलिबागचा प्रवास सुरु झाला.बोटीची तिकीट प्रत्येकी १५० रुपये आहे.

गेट वे ऑफ इंडिया 

साधारण दीड तासात आम्ही मांडवाला पोहचलो आणि तिथून मग त्यांचाच बसने पुढे अलिबाग ला पोहचलो .तो अजून एक तासाचा प्रवास आहे.  खूपच लवकर आणि नास्ता नकरता प्रवास सुरु केला होता म्हणून सर्वांचा पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. मग जवळच एक हॉटेल बघून मस्त मिसळ आणि वडापाव वर ताव मारून आम्ही निघालो अलिबागच्या समुद्रकिनारी.

स्पीड बोटीने केलेला कुलाबा पर्यंतचा प्रवास 

समुद्रकिनारी पोहचताच वॉटर स्पॉट वाल्यांची बडबड चालू झाली आम्ही थोडे पण इंटरेस्टेड नव्हतो आम्हला कुलाबा किल्याला जायचं होत .भरती असल्यामुळे बोट घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. मग एका स्पीड बोट वाल्याला विचारल्यावर प्रत्येकी १५० रुपये येऊन जाऊन सांगितले त्यानी . १५ मिनिटांमधे आम्ही कुलाबा किल्याला पोहचलो . आणि मग किल्याचा आत जाण्यासाठी प्रत्येकी १० रुपये पुरातत्व खात्याची प्रवेश फी आहे.

किल्यावरील मागील दरवाजा 
१९ मार्च १६८० ला हा किल्ला महाराजांनी बांधायला घेतला आम्ही प्रवेशद्वारातून प्रवेश केला किल्यावरचे बुरुज आणि तोफा बघतांना आंग्रे च्या मराठी आरमाराची ताकद लक्षात येते. प्रवेश केल्यावर डावी बाजूला भवानी मातेचं सुंदर मंदिर आहे आणि दीपमाळ आहे . आम्ही किल्याचा बुरजावरूनच पुढे निघालो . अथांग सागर आणि त्याचा आवाज मन वेडावून टाकतो . तिथून आम्ही किल्याचा मागील दरवाजामध्ये आलो. सुंदर गणेशाची मूर्ती दरवाजावर कोरली आहे . थोडा वेळ घालवून आम्ही किल्यावरील सिद्धिविनायकाचे मंदिर बघण्यासाठी निघालो . १७५९ साली कान्होजी आंग्रे नि हे मंदिर बांधले सुंदर कोरीव मंदिर आणि मंदिरासमोरील तुळशी वृंदावन आपलं लक्ष वेधून घेते. मंदिरासमोर पुष्करणी आहे . थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो किल्यावर एक गोड्या पाण्याची विहीर आहे .

 कुलाबा किल्याची भटकंती मस्त झाली येताना बाहेर बसलेल्या आजींकडून चिंच आणि बोर घेऊन परत बोटीने अलिबागला आलो आणि आता आमचं पुढच ठिकाण होत चौलच रामेश्वर मंदिर. आमची पूर्ण प्रवासाची लिस्ट अजिंक्य ने बनवून दिली होती.
अलिबाग वरून आम्ही चौलला जाण्यासाठी रिक्षा केली प्रत्येकी २५ रुपये देऊन चौलला आलो. मंदिर खूप सुंदर आहे बघताच क्षणी मंदिराची कौलारु छप्पर आणि चिरेबंदी आणि लाकडी बांधकाम डोळ्याला सुखावून जाते. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे. पण कुणी बांधलं याचा उल्लेख मिळत नाही. मंदिराचा जीर्णोद्धार कान्होजी आंग्रे यांनी बऱ्याच वेळा केला आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलंग आहे आणि गाभाऱ्याच्या समोरच सुंदर अशी पुष्करणी आहे.गाभाऱ्याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत.

रामेश्वर मंदिर 

पुष्करणी खूप सुंदर आहे बराच वेळ पुष्करणीचा इथे बसून घालवले. नंतर गाभाऱ्याचा प्रसन्न वातावरणात शांत बसून घालवले आणि नंतर मग आम्ही एकविरा शितळादेवीच दर्शन घेण्यासाठी निघालो, १५ मिनटांमध्ये आम्ही पोहचलो  .मंदिरा मधील आई देवीची मूर्ती मन सुखावून जाते .ह्या मंदिराचा उपयोग आंग्रेनि शस्त्रसाठा करण्यासाठी केला होता. दर्शन घेऊन आम्ही नांदगावला निघालो तिथे आमच्या राहण्याची सोय अजिंक्यने त्याचा मामांच्या रिसॉर्ट मध्ये केली होती . रेवदंडा वरून आम्हला नांदगावला जाणारी बस भेटणार होती. बराच वेळ वाट बघितल्या नंतर नांदगाव ला जाणारी बस आली. रेवदंडा ते नांदगाव चे अंतर २४ किलोमीटर आहे आम्हला साधारण १ तास लागणार होता. सर्व जण बसताच क्षणी झोपी गेले.

नांदगाव ला पोहचलो मामाचा मस्त दोन मजली टुमदार घर आहे. आम्ही एक रूम दोनदिवसाठी २००० रुपये देऊन घेतला होता. सर्वजण फ्रेश झालो आणि मस्तपैकी मामाचा नारळाच्या बागेमध्य  जेवण केलं. संपूर्ण नारळाची आणि सुपारीची उंचच उंच झाडे आहेत. जेवून थोड्या वेळ क्रिकेट खेळून आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनारी निघालो .

नारळाच्या बागेत बसून केलेलं जेवण 

 नांदगावचा  समुद्रकिनारा म्हणजे कोणालाही माहित नसलेला सुंदर नितांत सुंदर असा समुद्रकिनारा .खऱ्याखुऱ्या कोकणच्या समुद्रकिनाऱ्याची अनुभुती येथे येते. कुठल्याही प्रकारचे वॉटर स्पोर्ट नाही. गावकऱ्यांनी योग्य प्रमाणे स्वच्छ ठेवला आहे. आम्ही एक अदभूत सूर्यास्तचे साक्षीदार झालो. अंधार होईपर्यंत आम्ही किनाऱ्यावरच गप्पा मारत बसलो होतो . मामाचा जेवण्यासाठी फोन आला आणि मग मस्त जेवण करून आम्ही गाड झोपी गेलो.

नांदगावचा समुद्र किनारा 

सकाळी उठण्यासाठी उशीर झाला . सर्वानी अंगोळ आणि नाश्ता करून आम्ही मामाची रजा घेतली इथून आम्ही जंजिरा बघायला निघालो जाण्यापूर्वी गावात असलेल्या सुंदर श्री सिद्धिविनायक स्वयंभू गणेशाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरवात केली . आता इथून आम्ही टमटम करून मुरुडला पोहचलो आणि तिथून रिक्षा करून आम्ही खोरा बंधराला पोहचलो , इथून आम्हला जंजिराला जाण्यासाठी बोट भेटणार होती. पोहचल्यावर कळाले तिकीट विक्री हि जास्त पर्यटक आल्यामुळे बंद करण्यात आली आहे. किल्यावर बरीच गर्दी झाली होती. आम्ही तिथून निघालो  आणि मुरुड गावच्या बंदरावरून जाण्याच ठरवलं परत रिक्षा ने तिकडे पोहचलो. आणि तिथली तोबागर्दी पाहून सर्वांची नाराजी झाली. आता वेळेअभावी आम्ही जंजिरा न बघताच कोर्लई करून मुंबईला जाण्याचं ठरवलं.
श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर , नांदगाव 

आम्ही मुरुडचा बसडेपोला पोहचलो साधारण एक तास वाट बघतल्यानंतर रेवदंडा ला जाणारी बस आली.रेवदंडाच्या आधी असलेल्या कोर्लई स्टॉपला उतरलो इथून आपण पायी किंवा रिक्षाने किल्यापर्यंत जाऊ शकतो . आम्ही रिक्षा करून कोळीवाड्यात पोहचलो .
कोर्लई किल्याचा माघील दरवाजा 
कोर्लई किल्याचा पहिला दरवाजा 

 कुंडलिका खाडीच्या मुखाशी हा किल्ला बांधला आहे तिन्ही बाजूनी खाडी नेवेढला आहे. आम्ही लाईटहाऊसच्या इथून किल्याचा मुख्य दरवाजा मधून आत गेलो इथून आपणाला दर्शन होते ते एका विंहगम दृश्याची . एकीकडे आपण खाडी आणि सागराची भेट झालेली पाहतो लहान लहान मच्छिमारांच्या होड्या दिसतात. किल्यावर एक चर्च आहे तसेच पोर्तुगीजांनी कोरलेले शिलालेख आहेत. किल्यावर बऱ्याच तोफा आहेत . किल्यावर असलेल्या पाण्याच टाक बघायला भेटलं आणि तिंथून आम्ही पाणी भरून घेतलं आणि किल्याचा खाडीबाजूला असलेल्या दरवाजा बघायला निघालो हा दरवाजा सागरी मार्गाने व्यापार करण्यासाठीबांधला आहे. पुढे आम्ही किल्याचा शेवटच्या बुरुजाकडे पोहचलो आणि अलिबागच्या सुंदर प्रवासाचा शेवट केला.
कोर्लई किल्यावरचा चर्च 

७ वाजून गेले होते आता परत जाणारी बोट पण चुकली होती मग आम्ही लगबग करून किल्ला उतार झालो  आणि पायीच मुख्य बसस्टॉपला आलो सहासीटर ने आम्ही रेवदंड्यावरून अलिबाग ला पोहचलो . मस्त पैकी जेवण करून आम्ही पनवेलला जाणारी शिवशाही बस पकडली . पनवेल  ला पोहचलो सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आमच्या अलिबागच्या सागरी मोहमेची सांगता झाली.

आमचा सर्व प्रवास पाहण्यासाठी आमचं युट्युब चॅनला नक्की भेट द्या .


कुलाबा किल्ला :


रामेश्वर मंदिर आणि नांदगावचा समुद्रकिनारा :


कोर्लई किल्ला :


अलिबागचा प्रवास आपण गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्यावरून करू शकतो किंवा महाराष्ट्र महामंडळाची बस सुविधा उपलब्द आहे . 

अलिबाग मध्ये जेवणाची सोया उत्तम होते . नांदगाव मध्ये जेवणासाठी तुम्ही आर्य बीच रिसॉर्ट ला संपर्क करू शकता 

प्रशांत कोटवाला 
८९८३०९३७८४
९२७०१३२८८३

धन्यवाद !


Wednesday, November 29, 2017

मराठयांचा पराक्रमाची साक्ष देणारा - वसईचा किल्ला / Vasai fort

  जलदुर्ग आणि भुईकोट या दोन्ही प्रकारात मोडणार वसईचा किल्ला ,पश्चिम रेल्वे स्टेशनचा वसई जवळच असणारा हा किल्ला आजही मराठयांच्या  चिमाजी आप्पा यांचा पराक्रमाची साक्ष आजही देत उभा आहे . सकाळी डोंबिवली वरून मी ,लहू आणि तन्मयने ५. ३३ वाजता सुटणारी डोंबिवली ते विरार ट्रेन पकडून थेट वसई गाठले आणि पुढे मग वसई महानगरपालिकेचा १०५ नंबरच्या बसने किल्लाबंदर स्थानकावर उतरलो , १५मिनीटांच्या प्रवासानंतर बस आपणाला थेट किल्याचा आत मध्ये घेऊन जाते . 
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23559796_1416616511782410_785332928150219820_n.jpg?oh=0e5281243faa1324d829fabc7ab89488&oe=5A8E8BAF
मुख्य कोरीव दरवाजा
गडाचा विस्तार हा खूपच मोठा आहे संपूर्ण गड  फिरावयास आपणास साधारण २ते २. ३० तास लागतात .किल्ला पाहण्यास कुठून  सुरवात करावी हे आम्हांला कळत  नव्हते म्हणून एका रिक्षा वाल्यास विचारल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे मुख्य दरवाजा पासून आम्ही सुरवात केली. दरवाजातून आत गेल्यावर आपणाला पायऱ्या लागतात यातूनवर तटबंदीवर गेल्यास आपणाला गडाचा संपूर्ण परिसर पाहावयास भेटतो ,तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे . किल्याला एकूण दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. किल्ल्यामध्ये एकूण तीन चर्च आहेत .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23435202_1416615718449156_678409274660305329_n.jpg?oh=e667048e14754584e41b78c8521347fe&oe=5ACCE9C5https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23472726_1416615991782462_2399303751600333268_n.jpg?oh=6d4812544ac3669c9a8181d3482a671d&oe=5AD03D59

 किल्याचे प्रत्येक भाग पाहताना आपणास किल्ले बांधणाऱयांचे कौतुक करावेसे वाटते आणि आश्चर्य वाटत . गडावरच्या आतमधला परिसर विस्तीर्ण आहे यात एक विहीर आहे ,आतमध्ये एक आपणास तळे  आणि दोन विहिरीसारखे चौकोनी अवशेष असलेला चौथरा आहे. आम्ही एका चर्चसारखया इमारतीजवळ पोहचलो येथे आपणास एक बुरुज लागतो या बुरुजाच्या पायऱ्या सुस्थतीत असल्यामुळे आपण बुरुजाच्या शेवट्पर्यंत जाऊ शकतो . आम्ही वरती पोहचलो येथून दिसणारा समुद्र किनारयाचा नजारा  अप्रतिम दिसतो आणि  आपण किल्याचा संपूर्ण  परिसरहि  पाहू शकतो . या बुरजामुळे समुद्रामधून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवले जात असे . किल्याचे बांधकाम हे रोमन स्थापकलेचा वापर करून बांधलेलं आहे .एखाद्या चर्च प्रमाणे यातील इमारतींचे बांधकाम केलेले आहे .  सण १४१४ साली मध्य भंडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा  किल्ला बांधला पुढे पोर्तुगिजाने हा किल्ला जिंकून याचे बरेचसे पुनर्बांधकाम केले ,दहा वर्षाच्या कालावधीत त्यानी हे बांधकाम पूर्ण केले
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23473103_1416616431782418_6471311287708567872_n.jpg?oh=bf791737bf77bd427273ea7b998655df&oe=5A8A9816https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23472014_1416615765115818_5143508420064194966_n.jpg?oh=fc8a121539552b3446084e7d1b560c22&oe=5AD22F2B
किल्याच्या आतील तळ आणि सुंदर इमारतींचे अवशेष
जवळपास आम्ही संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्यामधल्या  पेशवेकालीन वज्राई देवीच्या मंदिरात पोहचलो . चिमाजी अप्पा यांनीया देवीला नवस केला होता कि आम्ही हा किल्ला जिंकलो कि यामंदिराचा जीर्णोद्धार करू ,मग चिमाजी अप्पानी हा किल्ला जिंकला आणि चिमाजी अप्पा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला . 
आम्ही मंदिरात पोहचलो तेव्हा मंदिराचे पुजारी देवीस वस्त्र नेसवत होते ,त्या मुळे  आम्हला देवीचं दर्शन घेता आले नाही ,आम्ही बाजुचा नागेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले . मंदिराच्या गाभऱ्यात शंकराची पिंडी आहे घाबरायचं चौकटी वर आपणास गणेशाची मूर्ती कोरली आहे ,मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर गणेशाची रिद्धी सिद्धी ची मूर्ती आणि एका बाजूस देवीची मूर्ती कोरली आहे . पिंडीच्या समोर महादेवाच्या नंदीची सुबक मूर्ती आणि दगडात कोरलेला कासव आहे . 
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23376259_1416615921782469_91471680613488202_n.jpg?oh=57b25b184af3d1f75e64e10c73ef3942&oe=5A99E1C9
टेहळणी बुरुज
बराच वेळ मंदिराच्या शांत परिसरात वेळ घालवल्या नंतर आम्ही किल्ल्याचा  दर्या दरवाजाकडे निघालो दरवाजाचे बुरुज अजूनही सुस्थतीत आहेत  ,पण लाखडी दरवाजा हा मोडकलेल्या अवस्थेत आहे . येथून पुढे समोर चालत गेल्यावर आपण समुद्राच्या बंदरावर जाऊन पोचतो ,किनाऱयावर  मच्छिमार कोळि लोकांची लगबग चालू होती . थोडावेळ येथे फिरून आम्ही चिमाजी अप्पांच्या वाड्याकडे निघालो.चिमाजी अप्पांच्या वाड्यामध्येच पुरात्तव विभागाने हे स्मारक बांधले आहे . बाजूलाच चिमाजी अप्पांचा वाड्याचे अवशेष लागतात . वाडा खूप मोठा आहे . वाड्याचा आणि सुपूर्ण किल्ल्यामध्ये ताडीची झाडे खूप आहेत .या परिसरात फिरताना आपणास चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची आठवण  आल्याशिवाय राहत नाही .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23319162_1416616078449120_2130858257811400593_n.jpg?oh=59b5ee13415e9096d0e0efd9539b8201&oe=5ACCDC3Bhttps://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23435061_1416616311782430_4781297620595681226_n.jpg?oh=673c7d9372a0470be81536914212e85e&oe=5A8EA07C
इ. स १७३७ साली मराठयांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला मग पुढे बाजीराव पेशव्यांनी हि मोहीम चिमाजी अप्पांवर सोपवली १७३८ साली चिमाजी अप्पानी मोहीम आखली . चिमाजी अप्पानी किल्याचा दलदलीच्या बाजूनी हल्ला करावयाचे ठरवले ,तटाच्या  उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सेन्य हरहर महादेव करत आत शिरले , दोन दिवस चालेल्या या पोर्तुगाच्या विरुद्धचा लढाईत पोर्तुनगांचे ८०० जण मारले गेले , मराठयांची हि बरीच हानी झाली . पोर्तुगाचं दारुगोळा संपला आणि ते मराठांशी शरण आले ,मराठ्यनी बायकापोरांना  सुखरूप बाहेर जाऊ दिले ,आणि मराठ्यांनी किल्ला सर केला भगवा फडकला .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23380407_1416615811782480_6637866781104477269_n.jpg?oh=dbbb9ab3bc82c86317ab31f91b472318&oe=5A94DCA5
नरवीर चिमाजी अप्पा स्मारक
बराच वेळ किल्यावर भटकंती केल्यावर आम्ही पुन्हा बस पकडून वसई स्टेशन वर पोहचलो आणि मग ,विरार -कोपर ट्रेनने मुंबई गाठली . 


किल्याची सद्याची परिस्थिती : 
स्वान्त्र्यनंतर या किल्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही ,किल्यावर माजलेले रान आणि मोठमोठी झाडे या मुळे किल्याचे बुरुज ठसलेल्या अवस्थेत आहेत , सद्य पुरात्तव  विभागाने या किल्याचे डागडुगीचे काम हाती घेतले आहे ,किल्यावर सध्या प्री -वेडींग फोटोग्राफी करणाऱ्या जोडप्यांचा  फारच सुळसुळाट असतो . सोबत येणारे प्रेमी जोडपे यामुळे आणि त्याचा वावर या मुळे आपण किल्याचा पराक्रम विसरत चालो आहोत एवढे मात्र नक्की . 
पुरातर्न विभागाने याकडे लक्ष देऊन किल्याचे ऐतिहासिक महत्व राखण्यासाठी जागोजागी माहिती फलक लावले पाहिजे . आणि प्री वेडिंग फोटोग्राफी वाल्याकडून पैसे चार्जे करून त्याचा उपयोग किल्याचा डागडुजी साठी करावा हीच अपेक्षा .

संधर्भ : https://mr.wikipedia.org

आपल्या चॅनेल वरील वसईचा किल्ला वलॉंग नक्की पहा.

धन्यवाद !
अंकुश सावंत. 
+९१ ९७६८१५३११४

Wednesday, August 2, 2017

माहुलीगड - ठाणे जिल्यातील उंच शिखर ( Mahuli Fort )

पावसाळा सुरू झाला की ओढ लागते ती भटकंतीची ..मी समीर ला सांगत होतो कुठेतरी जबरदस्त ट्रेक प्लान करायला, कलावंतीण ट्रेक च्या वेळी तिकोना ठरला होता पण,ऑफिस मध्ये तन्मयने "माहुली किल्याला भेट द्यायची का?" अस विचारलं आणि मग तिकोना चा प्लॅन थेट ठाणे जिल्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या  माहुलीगडावर आला.

मग थोडीशी ऐतिहासिक माहिती गूगल वरून शोधली.किल्याचा इतिहास खूपच रोचक आहे ... 
किल्याची मूळ उभारणी कोणी केली ती माहिती उपलब्द नाही ,शहाजीराजे  निजामशाही चे  संचालक बनल्यावर निजामशाही ला वाचवण्यासाठी त्यांनी माहुलीगडाचा आधार घेतला . १६३५-३६ च्या सुमारास बालशिवाजी आणि माता जिजाऊंना त्यांनी शिवनेरीहून माहुलीला आणले .. पुढे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला पुढे १६५८ मध्ये शिवरायांनी हा किल्ला मोघलांकडून परत मिळवला .. १६६१ ला परत मुघलांच्या ताब्यात गेला आणि लगेच तो परत जिंकला आणि १६६५ च्या पुरंदर तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले(www.marathimati.net/mahuli-fort/)

अशा ऐतिहासिक किल्याला भेट देण्यासाठी उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. वीकएंड दिवशी माहुलीगडच्या पायथयशी असलेल्या थबठब्यात भिजण्यासाठी तरुणाईची गर्दी होते ,मग गर्दीच्या दिवशीं नको म्हणून  आम्ही गुरुवारी जायचं ठरल .पण,ऑफिसला सुट्टी नसल्याने तन्मय आणि प्रवीण काही येऊ शकले नाही यावेळी समीर आणि महेंद्र सोबत दोघे  घाटकोपरकर  येणार होते समीरचा मोठा भाऊ सचिन आणि त्यांचा मित्र सुरज. 

ठरल्याप्रमाणे भल्या सकाळी उठून आईने दिलेल्या भाकऱ्या,पाऊस जोरदार असल्याने जॅकेट आणि मोबाईलला पिशव्या घेऊन प्रस्थान झाले...घाटकोपर वरून समीरने सांगितलेल्या ६.२५ची ट्रेन बरोबर पकडली. 8 वाजता आसनगावला पोहचलो. सुरज सोडून सर्वाना याआधी भेटलेला मग .सुरजची ओळख समीरने  करून दिली आणि बोलत बोलत पुढे निगालो . स्टेशनलाच एक अण्णा इडली वाला दिसला आणि आत्ता इथेच नष्ट उरकायचा ठरलं, सकाळी लवकर नाश्ता नकरताच निघाल्यामुळे सर्वानीच 'इडली आणि उत्तपावर' मस्त ताव मारला."हल्ली मुंबई मध्ये वडापाव ऐवजी ह्या साऊथ इंडियन इडलीची चव चांगली लागायला लागलीय..."

स्टेशन बाहेर माहुलीगावात जाणाऱ्या रिक्षा मिळतात . ५जणांचे ३००रुपये सांगितले .थोडं खर्चिक होत पण बससाठी बराच वेळ असल्याने रिक्षाकरून पुढे निघालो. नाशिक मुंबई मार्गवरून शहापूर फाट्याला रिक्षावळवून  माहुलीगावात निघालो .  पेट्रोल पंप ला रिक्षा थांबवून  रिक्षा वाल्या काकांनी ऑटोला डिझेल चाखाऊ दिला...पुढे जाताना मानसमंदिर लागत...पुढे पक्का रस्ता कच्चा होत गेला..गावात जाताना गडूळ पाण्यानी जोरदार वेगाने खळखळ करत निघालेली नदी लागली...पुढे आत्ता रस्ता म्हणजे निवळ खडे लागले होते ... गावकऱ्यांची शेतीची लगबग चालू होती ,रस्त्याला लागूनच आदिवासी लोकांची घरे लागतात.घर नाही बोलू शकणार आपण याला पाडे बोलू शकतो.निगडी किंवा सरळ झाडांच्या खांदयने बांधून त्यावर लालमतीचा दिलेला लेप...
                           माहुलीगडाची कमानी 
जवळपास ३०ते ४० मिनिटाच्या ४किलोमीटर च्या प्रवासानंतर आम्ही माहुलीगडच्या पायथयशी पोहचलो...किल्याच्या पायथयशी एका काकांची हॉटेलसारखी टपरी आहे .हसून काकांनी स्वागत केलं..चहाची सर्वांनाच गरज होती गरमागरम चहा झाला ...काकांआम्हला पुढे कस जायचं ते सांगत होते .त्याना वाटलंकि आम्ही वॉटरफल मध्ये जाण्यासाठी आलोय...किल्ल्याच सांगीतल्यावर मग त्यानी गेट मधून जाऊन जवळपास ३ तासची चढाई आहे म्हणून सांगितले..गेल्याच रविवारी माहुली  थबधब्यात मद्यधुंद असलेला कुण्या "पाटलाचा पोरगा मेला" ही बातमीही त्यानी आमच्या कानावर घातली..धबधब्यात गेलात तर काळजीपूर्वक जा असं सांगितलं...मग आम्ही निघताना त्यांचाकडेच जेवणाचा बेत आखून पुढे निघालो .
नदीशेजारच बाप्पाचं सुंदर मंदिर. 
ट्रेकची सुरवातच पाऊस आणि नदीशेजारच्या बाप्पाच्या सुंदर दर्शनाने झाली.अप्रतिम मंदिर आहे...पुढे माहुलीगडाच्या कमानीतून आत प्रवेश केला . या परिसराचा महाराष्ट्रसरकारने पर्यटनस्थळ म्हणून विकास केला आहे...गेट वर प्रत्येकी २५ रुपये द्यावे लागतात, परिसरात किल्याची ऐतिहासिक माहिती देणारे फलक लावलेले आहेत ...कृत्रिम पशु आणि पक्षांचे  पुतळे बसवले आहेत...बऱयापैकी विकास केला आहे इथला.माहुलीच्या या सुरवातीच्या जंगलातून जाणारी ही वाट थेट नदीचा कटापर्यंत जाते पूढे सुंदरसा ब्रिज पार करून आम्ही उजवीकडून किल्याचा वाटेकडे निघालो .दोन फुटणाऱ्या फाट्यावर पर्यटनस्थळचे पाट्या लावले आहेत ..आम्ही आत्ता माहुलीच्या जंगलातली मळलीले पायवाट धरली आणि ट्रेक खऱ्या अर्थाने सुरू झाली घनदाट झाडी असल्याकारणाने आजूबाजूचा परिसर नजरेत येत नव्हता ..पावसाने सुरवातीपासूनच जोर घेतला होता..माही आणि सुरज दोघे पुढे पटापट निघाले  मी, समीर आणि सचिनदादा हळू हळू मार्गक्रमण चालत होतो...जवळपास अर्धा तास चालल्यानंतर घनदाट जंगल संपून खडा चड सुरू होतो...खरा ट्रेक चालू झाला होता...दादाची पहिलीच ट्रेक असल्याने सुरवातीला दमछाक होणे साहजिकच होते.
प्रत्येक किल्यावर अस एक ठिकाण असत जिथे पोहचलो की फोटोग्राफी चा मोह आवरत नाही अशा एक पठारसारखा भाग जेथून संपूर्ण आजूबाजूचा परिसर दिसून येत होता तिथे थोड्या वेळ आराम करून आम्ही निघालो....पण धुक्याची शाल पांघरल्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं...जरावेळ ठावरून पुढे निघलो...

सह्यन्द्रीची अजस्त्र डोंगररांग आणि त्यावरून कोसळणारे धबधबे 
आमची चढाई माहुलीच्या  दिशेने चालू होती..तानसा अभयारण्य म्हणून ओळखला जाणाराहा परिसर अतिशय सुंदर आहे.जोरदार पाऊस असल्याने धुक्याने पूर्ण शाल पांघरलेली.माहुली गडाची डोंगररांग धुक्यामध्ये हरवलेली होती.आम्ही थोडीशी मध्ये मध्ये विश्रांती घेत भराभर चालत होतो..पाऊस आणि धुक्याचा खेळ बघण्याचं भाग्य आम्हला आजलाभत होत.क्षणात दृष्टीस येणारी डोंगररांग क्षणात येणाऱ्या धुक्यामध्ये नाहीशी होयची ... पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे डोंगररांगमधून जोरदार वेगाने कोसळणारे धबधबे स्पष्ट पने दिसत होते.आणि क्षणात हा सर्व परिसर आमच्याकडे येणाऱ्या धुक्यामध्ये हरवून गेला.सर्व काही भन्नाट!!!कवी बालकवींचा काही ओळी आठवतात... 
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे"

येथे मात्र उन्हा ऐवजी धुकं होत.आत्ता भराभर पाऊले टाकत चालो होतो..मागच्या ट्रेकच्या आठवणींना उजाळा देत पावलं पडत होती . विकटगड सारखाच हा परिसर आहे . वाटेत एक दोन रॉकपॅच आहेत..सर्वानी सांभाळून पार केले..अतिउत्साह इथे टाळावा..जवळपास तीन ते चार किलोमीटरचा खडा चड पार करून आम्ही शिडीच्या वाटेपर्यंत पोहचलो.समोरच्याच एका मोठ्या कातळावर बॅग टाकल्या.  कातलावरून पाठीमागचा  पूर्ण सह्यन्द्रीचा परिसर,धबधबे  आणि समोर माहुलीगडाची तटबंदी आणि त्यावर फडकत असलेला भगवा !!!सर्व नजारा अप्रतिम.. !
                          गडावर जाणारी शिडीची वाट 
पाऊस असल्याने तहानजास्त लागली नव्हती ,आम्हीही पाण्याचा फक्त दोनच बॉटल्स आणल्या होत्या..कातळावर बसून मस्त दोनचार फोटो घेतले...माहि बॉटल घेऊन कड्यावरून थेंबथेंब पडणार पाणी बोटलमध्ये भरत होता..सोबत आणलेली बिस्कीट खाऊन शिडी चढायला सुरू केली..वनविभागाने ही शिडी लावलीय...शिडी नसली असती तर गिर्यारोहनचा अनुभव आणि साहीत्य  असणं आवश्यक आहे..लोखंडी शिडी काळजीपूर्वक पार झाली.. इथे काळजीपूर्वक पाय टाकावेत.. प्रथम दादा आणि नंतर सर्वानीच एके एक करत शिडी पार केली...आणि आम्ही आमच्या भगव्या लक्ष्याकडे पोहचलो..वरून दिसणाऱ्या नजऱ्यामुळे तीनकिलोमीटरचा टप्पा पार करून आल्यानंतरचा थकवा पूर्णपणे कुठे तरी निघून गेला...संपूर्ण परिसर म्हणजे निसर्गच नयनरम्य दृश्य ज्याची तुलना कोणाशीही होऊ  शकत नाही...फोटोग्राफीची हौस येथे भागवून घेतली मग  सर्व आसमंत नजरेत साठवत बराच वेळ येथे आम्ही सर्वांनी घालवला, .

गडावर तर पोहचलो आत्ता पुढे जाण्याचा मार्ग कसा कोणालाच माहीत नव्हत सर्वांनी यू ट्यूब वर बघतलेला महादरवाजा आणि देवड्यांचे अवशेष एवढच कायते माहित .पण नेमकं कुठे जायचं हे कोणालाच ठाऊक नव्हतं मग,एक मळल्या वाटेने पुढे जाण्याचं ठरलं ...डावीकडे जाणारी वाट पकडली आणि थोड्यच वेळात आम्हला पाण्याचं टाक लागलं...आम्ही बरोबर चालतोय याची ती खून होती . त्या टाकाची पाहणीकरत थोडा वेळ घालवला आणि पुढे निघालो . 
महादेवाची पिंड 
थोड्याच वेळात आम्हला भंडारगडाकडे जाणारी पाटी दिसली आम्ही तिकडे परतीच्या वेळी जाण्याचं ठरवून आम्ही महादरवाजाचा शोध घेण्यासाठी पुढे निघालो...थोड्याच वेळात आम्ही महादरवाजाच्या परिसरात पोहचलो..निसरड्या वाटेवरून उतरून शेवटी ज्याचा शोध घेत होतो त्या  एतोहासिक महादरवाजा पर्यंत पोहचलो. होतो .भारीच वाटत होत .सुरवातीला एक पाण्याच टाक लागत पुढे पिपळाच्या झडकली भग्नावस्थेतील महादेवाची पिंड त्याचा अगदी समोर महाराजांची छोटीशी सिहासंन आरूढ मूर्ती लागते ...नतमस्तक होऊन पायऱ्या उतरून महादरवाजकडे आलो..दोनीही बाजूला सैनिकांच्या राहण्याचा देवड्या लागतात..आणि नंतर महादरवाजा ...महादरवाजा हा भग्नावस्थत आहे...गडाची तटबंदी बऱयापैकी शाबूत आहे..महादरवाजाचा पायथयशी दोन शरभ शिल्प लागतात आणि एक कामळासारखं शिल्प आढळत...पायऱ्या उतरून नंतर आम्ही बुरुजावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला.. हा सर्व ऐतिहासिक वारसा अनुभवताना सर्वचजण दंग झाले होते...
महादरवाजा 
शरभ शिल्प
 बराच वेळ घालवल्यावर आम्ही पळसगडाच्या शोधात निघालो .आमची मोहीम  उत्तरेकडे वळवली ...पाऊस आत्ता जोरदार चालू झाला होता.वाटेतील ओढे वेग घेऊन वाहू लागले होते.झुडप मानेपर्यंत आली होती.झुडपांमुळे थोडा अंधार झल्यासारखं वाटत होत ..दोनीबाजूला कार्वीच जंगल आणि समोर दिसणारी मळवट वाट भराभर पार करत होतो ...महिच्या पाटी आम्ही झपाट्याने चालत होतो...बराच वेळ चालून ही काहीच भेटत नव्हतं .. थोडी निराशाच झाली मग सर्वांच्या अनुमतीने मग परत फिरायचा ठरलं...धोधो पावसातून  पळसगड शोधण्यासाठी केलेली हि पायपीट खूपच थरारक होती..कधीही नविसरता येणारा अनुभव होता...
अश्वारूढ छत्रपती महाराजांची मूर्ती 

आम्ही परत महादरवाजकडे पोहचलो तर ७ते ८ मुलांचा ग्रुप किल्याची पाहिनी करण्यासाठी आला होता आम्ही काहीच नविचारता पुढे निघालो .चालून खूप थकवा आला होता पाऊसाने विश्रन्ती घेतली होती आम्ही हि सोबत आणलेली बिस्केट फस्त केली. आणि बिस्किटाचे पॉकेट्स पार्ट खिशात टाकून प्रवास चालू ..आता माहुली , पळसगड दोन टोकानंतर आता भंडारगडाकडे मोहीम वळवायची होती. भंडारदर च्या खालचा वाटेकडे पायपीट चालू केली , पाऊसाने परत जोर धरला होता..वाटेमध्ये गुडग्या एव्हडं पाणी असलेलं ओढे हातांची साखळी करत पार केले ..दाट झाडी असल्याने सावधगिरीने खाली वाकून काटेरी झुडपं पार करावी लागत होती.थोड्याच वेळात आम्ही दोन पडक्या वीरगळी पर्यंत पोहचलो पुढे पडलेल्या वाड्याचे अवशेष लागतात .पाऊले पटापट पडत होती सौन्दर्याने नटलेल्या अफाट जंगलातून आम्ही एका पडलेल्या महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहचलो.. मंदिरासमोरच नजर पोहचणार नाही एव्हडा मोठं तळ आहे.सर्व काही बघून थोडं पुढेपर्यंत गेलो मग पुढे काहीच नाही असल्याचा समज करून आम्हीपरतीच्या मार्गाला लागलो ...

आम्हला वाटेमध्ये परत तीच मुलं  भेटली त्यानां  विचारणा केली ,कुठून आलो असविचारल्यावर "हिंदी मे बोलो "
असं बोला मग कळलं कि मध्यप्रदेश वरून किल्याला भेट द्यायला ते आले होते . खरच कुतूहल वाटलं त्यांचं . एकीकडे हि मंडळी एवढ्या लांबून किल्ला बघायला आली होती आणि एकीकडे आमची मराठी तरुणाई मध्यधुंद स्थितीत धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत होती.
निसर्गच्या कुशीतले काही निवांत क्षण 
आम्ही किल्यावरच्या बऱ्याच गोष्टी पाहण्याचा राहून गेल्या होत्या पण वेळेअभावी परत मागे फिरण्याचा निर्णय सर्वानी घेतला .पाऊले पटापट खालच्या मार्गाला लागली .पाऊस ओसरला होता किल्यावर जातांना धुक्यात हरवलेला डोंगरमाळ आणि त्यावरचे पांढरेशुब्र धबधबे आत्ता स्पष्ट दिसत होती निसर्गाच्या अजस्त्र रूपाचा अनुभव आम्ही घेत होतो .सर्वजण शांतपणे नबोलता चालत होते .. पाय अगदी मोडकळीस आले होते उतरताना नेहमीच चढण्यापेक्षा जास्त त्रास होतो...चालताना बरच काही मनात चाक होत बऱ्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या पण, ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी केलेली थरारक आणि जबरदस्त भटकंती , भग्नावस्थेत असलेला महादरवाजा , मंदिराचे अवशेष सर्व काही मनाचा एका कोपऱ्यात घर करून गेलं होत,,!
बराच वेळाच्या पायपिटीनंतर आम्ही टपरीवर पोहचलो जेवण तयार होत पोटात भुकेने  कावळे ओरडत होते . काकांनी जेवण वाढलं ..गरमागरम भाकऱ्या , वांगयची भाजी ,मटण आणि वारणभातावर सर्वानीच ताव मारला .. .संगीतल्याप्रमााने रिक्षा वाले काका आम्हला घायला आले होते..परतीचा प्रवास सुरु झाला... 

आजचा दिवस अगदी सार्थकी लागला होता..ना फोनची रिंग,ना गाड्यांचे आवाज,  निरव शांतता...सर्व काही भारीच...!!!




किल्याचे नाव - माहुलीगड 

प्रकार - गिरीदुर्ग

उंची-2815

श्रेणी - मध्यम ते कठीण

जाण्याचा मार्ग -आसनगाव रेल्वेस्टेशन - माहुलीगाव 

बघण्यासारखं  -  प्राचीन पाण्याची टाके , महादरवाजा , पहारेकार्यनच्या देवड्या , भडारगडावरच भग्नावस्थेतील महादेव मंदिर , समोरचा तलाव पुढे गेल्यावर जांभळाच्या राय आणि नंतर लागते ती माहुली आणि भदारगडामधली खिंड आणि त्यामधला कल्याण दरवाजा , वरून दिसणारा अलंग ,मलंग,हरिश्चंद्रगडाची डोंगररांग

धन्यवाद !
अंकुश सावंत
+९१ ९७६८१५३११४

Wednesday, July 26, 2017

शरभ शिल्प ( Sharbh Shilp )


           सह्यन्द्री मध्ये भटकंती करत असताना नेहमीच काहीतरी नवीन पाहायला अनुभवायला भेटत . किल्यांवर गेल्यावर तिथले बुरुज,तळी,दरवाजे आणि द्वारशिल्प म्हणजे कधीही आपल्या पूर्वजांचा उज्वल इतिहासाचा जिवंत पुरावा . या सर्व ऐतिहासिक वास्तूंचा  अभ्यास करावा तेवढा कमीच..

 रविवार, २० ऑगस्टला ऐतिहासिक माहुली किल्याला भेट दिली. तिथला ऐतिहासिक महादरवाजा,बुरुज , लेणी, शिल्प सर्वच काही मन इतिहासात घेऊन जाणार...माहुली किल्यावर महादरवाजाच्या पायथ्याशी आम्ही एक शिल्प बघतलं वाघासारखं प्राण्याचं हे शिल्प ..हिंदूं पुरतान लिखाणात  या शरभचा उल्लेख आठळतो . 

माहुली किल्यावर दोन पंख असलेलं शरभाच आगळंवेगळं शिल्प 
  
चार पाय , विक्राळ मुख आणि लांब शेपूट असणारा हा काल्पनिक पशु म्हणजे  " शरभ " . हिंदू पुरातना नुसार शरभ हा  शंकराचा अवतार.  शंकराचा भक्त राक्षस हिरण्यकश्यपु याचा वध करण्यासाठी विष्णुने  नरसिहांचा अवतार घेतला .पुढे हिरण्यकशपु वधानंतर  नरसिहांचा   क्रोद काही केल्या आवरेना , तो सर्वांना त्रास देऊ लागला मग सर्व देवदेवतांनी सृष्टीच्या निर्मात्या महादेवांचा धावा केला मग शंकरानी सिंहासारखं विक्राळ तोंड , तीक्ष्ण नख , दोन पंख , चार पाय आणी लांब शेपूट असलेल्या शरभाच रूप घेतल आणि नरसिहांचा वध केला आणि त्याची मुंडकीने आपलं मुकुट सुशोभित केल आणि कातडीने आपलं आसन म्हणून परिधान केलं . तेच हे शंकराचे शरभ अवतार  .

कामिकागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.सुप्रसिद्ध महाकवी कालिदास याने लिहलेल्या " मेघदूत" या काव्यात  शरभा विषयी बरच लेखन केलं आहे .

हिंदू पुरातन मधल्या ह्याच शरभाची मुसलमान राजांनी आपलं द्वारशिल्प म्हणून वापर केला .मुस्लिम राजवटींनी या शरभ शिल्पाला सिंह ' जंगलाचा राजा ' म्हणून आपल्या किल्यांच्या द्वारावर स्थान दिलेलं असावा .. 

महाराष्ट्रातील बऱ्याच किल्यांवर शरभ शिल्प कोरलेलं दिसून येत . हे शिल्प वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत कधी एकटाच शरभ कोरलेला असतो तर कधी त्याचा मुखात गरुडभेद , हत्ती असं दिसून येतात .आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी त्याकाळच्या राजवटींनी याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसून येतो .

शिवनेरी किल्ला कित्येक वर्ष निजामशाही ,मुघल  यांच्या राजवटी खाली असलेल्या शिवनेरीच्या पाचही द्वारांवर शरभ शिल्प दिसून येत. किल्ले जंजिऱ्यावर चार पायामध्ये एक तोंडात आणि एक आपल्या शेपटीत हत्ती पकडलेला शरभाच शिल्प भिंतीवर कोरलेलं आहे .याचा अर्थ हत्ती प्रमाणे बळकट असणाऱ्या शत्रूला आम्ही मात देऊ शकतो असा होतो

१५६५ च्या तालिकोटच्या लढाई नंतर मुसलमान राजवटींनी अनेक छोटीराज्य जिंकून घेतली याचंच प्रतीक म्हणून पायामध्ये हत्ती दाखवण्याची हि प्रथा पडली असावी ...असा उल्लेख इतिहासात आहे .

माहुली किल्ल्यावरच भग्न अवस्थेत असलेलं  शरभ शिल्प 
माहुली किल्यावर  दोन  पंख असलेलं  शरभाची दोन  आगळीवेगळी   शिल्प आहे . माहुली किल्यावर  एक शिल्प पूर्ण अवस्थेत आहे आणि दुसरं तुटलेल्या स्तिथीत आहे.  तुटलेलं शिल्प हे गडसंवर्धन करताना "सह्यन्द्रीचे रखवालदार" या दुर्गसंवर्धन संस्थेला मातीच्या ढीगाऱ्या खाली सापडलं .

रायगड,,सिह्गड,सुतोंडा,पेठ, अवचितगड , राजगड इत्यादि अनेख किल्यांवर शरभ शिल्प वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत. वेताळवाडी किल्यावर दोन बाजूनं दोन शरभ असून एकाच धडाला दोन तोंड असलेलं शरभाच दुर्मिळ शिल्प आहे .

गडांवरची हि शिल्प म्हणजे अभ्यास करण्याचा स्वतंत्र विषय .याच शिल्पांचा आधार घेऊन आपण इतिहासाची बरीच पाने उलगडू शकतो .किल्यानं भेट देतांना अशाच ऐतिहासिक वस्तुंना आपण कुठे इजा  पोचवणारा  नाही याची जरूर काळजी घ्या.


संदर्भ : विकिपीडिया आणि लोकसत्ता.कॉम.

अंकुश सावंत.
+९१ ९७६८१५३११४. 

Tuesday, June 13, 2017

कलावंतीण दुर्ग ( Kalavantin Fort )

    ह्या वर्षी सूर्यनारायणांनी दिलेल्या अति त्रासामुळे गोरखगडा नंतर कुठे ट्रेकिंगला जाऊ शकलो नव्हतो बऱ्याच दिवस कलावंतीण माची करायची मनात होत पण बातम्या बघताना प्रभळगडावर एका  महिलाट्रेकर्सचा झालेला मृत्य, यामुळे मनात प्रबळगड आणि कलावंतीण माची करायची कि नाही अशी चल बिचल चालू होती आणि त्यात ऑफिस आणि घराच्या जबाबदाऱ्या, प्लान बनत होते फसत होते. पण आता मात्र पाऊसाची चाहूल लागली आणि  ऑफिस मध्ये सोबती समीर आणि आपले नवीन मित्रांनी कलावंतीण चा प्लॅन  फिक्स केला.

समीर ,महेंद्र ,तन्मय आणि प्रवीण आणि मी असे ५जणांचा ग्रुप बनलाशनिवार, रविवार सुट्टी असल्याने शनिवारचा दिवस फिक्स झाला . प्लान एक आठवड्या आदीच बनला असल्याने कलावंतीण माचीची नेहमी प्रमाणेच माहिती मिळवायला सुरवात झाली . कुठल्याही ठिकाणाची अचूक माहिती मिळवण्याचं ठिकाण म्हणजे तिथे जाऊन आलेलया भटक्यांनी लिहलेले ब्लॉग्स . मग आठवडाभर असेच ब्लॉग्स वाचून बऱ्यापैकी माहिती मिळाली . आणि आपला माही ( महेंद्र) याने तर दोन वेळा कलावंतीण सर केलेला..  मग आता तर काही काळजी करण्याचं कारणच नव्हतं .शुक्रवारी ऑफिस मध्ये ट्रेनच नियोजन करून पनवेलला ठीक वाजता भेटायच ठरलं..  समीर , माही सोबत प्रवीण येणार होता आणि मी आणि तन्मय आम्ही कल्याण डोंबिवली कर एकत्र येणार होतो .

            कलावंती आणि प्रबळगडची डोंगररांग 
सकाळी पहाटेच उठून गरमगरम चहा पोटात टाकला आणि फक्त पाण्यानी भरलेली  बॅग अडकवून मोहिमेला सुरवात केली . यावेळी आईला भाकऱ्या बनवण्यापासून  थोडा आरामच दिलाशनिवार असल्याने ट्रेन मधला गर्दीचा पूर बऱ्यापैकी खाली होताट्रेनच टाईमिंग अगदी उत्तम जुळून आल्यानं बरोबर :१५ वाजता सर्व पनवेल ला भेटलो .सर्वांची ओळख समीर ने माही सोबत करून दिली . माही ने यापूर्वी सुद्धा कलावंतीण केलेली असल्याने सर्व ट्रेकची जबाबदारी त्याचाकडे होती .बाप्पाचं नाव घेऊन मग  आमचे आजचे गाईड महेंद्र यांच्या सोबत बसडेपोकडे प्रस्थान केले.

सकाळचे जेमतेम साडेसात वाजलेले तरी हि सूर्यनारायण चांगलाच त्रास देत होता , पंधरा मिनिटांच्या पायपिटी नंतर आम्ही पनवेल बस डेपोत पोहचलो . उन्हाने चांगलाच घामटा काढला आता मात्र सूर्यनारायण अशीच आग ओतत राहिले तर ट्रेकिंग अवघड होईल याची काळजी वाटत होती .

 बस डेपोवरच्या कल्लोळा मधून माहि ने पटकन वाट काडत शेउंड गावाकडे जाणाऱ्या बसचा मागोवा काडला . बस मध्ये सर्वजण चढल्यावर थोडे माझ्या पोटातले कावळे ओरडू लागले ,तन्मयला वडापाव आणायला सांगितले . पण बस उशिरा निघणार म्हंटल्यावर माहीने खाजगी वाहनाने कूच करायचं सुचवलं  आणि सर्वानी होकार दिल्यावर बस डेपोमधून बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा वाल्यांकडे चौकशी केली असता जवळजवळ पूर्ण ट्रेककिंगचा खर्च निघेल एव्हडं भाड सांगलत मग पुढे गेल्यावर एका भल्या ऑटो वाल्यानी थोडस पुढे जाऊन ब्रिज खालून शेउंड फाट्यावर जायला सांगितले आणि नंतर पुढे ऑटो करून ठाकूरवाडी गावात...  सर्वानाच कमित कमी खर्चात सोयीस्कर वाटल मग सहासीटर  मध्ये बसून थेट शेऊंड फाटा गाठला नंतर शेउंडफाट्याला उतरून मग थोडी केळी , पाण्याचा बाटल्या घेऊन थेट ठाकूरवाडी गाठली...
 आपल वेगळं पण राखून ठेवलेलं झाड . 
नागमोडी वाट गावातून जाते गावाचं बऱयापैकी शहरीकरण झालेलं लांबून आम्हला प्रबळगडाची रांग दिसत होती वातावरण पूर्णपणे पाऊसप्रमेने मळवट झालेलं ओल्या मातीचा सुगंध..  ! ऑटो वाल्यानी काकांनी सांगितलं काल जोरदार पाऊस पूर्ण रात्रभरझालेला .ट्रेकिंग साठी उत्तमअस वातावरण झालं होतं  दोन ते तीन किलोमीटर अंतर पार झाल्या नंतर ऑटो वाल्या काकांनी थेट आम्हला जंगलाचा पायथयशी आणून सोडलं . काकांचे धन्यवाद मानून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला...

 सुरवात एका फोटोसेशन ने झाली कलावंतीण कडे जाणारी वाट अगदीच मळलेली दिसत होती बऱयापैकी रुंद समोरची डोंगररांग पूर्णपणे नजरेत येत होती.आता सर्व परिसर न्याहळत आम्ही पुढे चालत होतो.. मध्ये मध्ये फोटोसेशन चालू होतो ..पाऊले आता पटापट टाकत निघालो सूर्य सुद्धा मध्यावर आलेला...आजूबाजूचा परिसर म्हणजे फक्त अप्रतिम !!!
सुरवातीपासूनच गावातल्या मंडळींनी दगडांवर बाणच निशाण करून मार्ग सोपा केला आहे .त्यालाच फोल्लो करत  जवळपास 30 मिनटं चालून झाल्यावर मात्र माहीला सोडून सर्वांचा घमटा निघाला होता थोडं पाण्याचं घोट पोटात टाकून पुढची चढाई चालू केली . आत्ता उभा चड चालू झाला अजून काही ट्रेकर्स मंडळी सुद्धा हबकत हबकत चडत होते बहुतेक त्यांचा पूर्ण ग्रुप रात्री स्टे करण्यासाठी आले होते. निसरडी वाट आणि संपूर्ण प्रबळगडाची डोंगररांग यांचं सोंदर्य न्याहळत आम्ही पुढे निघालोप्रवीण ची चांगलीच दमछाक झाली होती मग त्याच्यासोबत बराच वेळ विश्राम घेऊन परत मार्गक्रमनाला सुरवात झाली वाटे मध्ये झोपडीसारखे असलेले हॉटेल लागलं त्यात काही ट्रेकर्स मंडळी लिंबूसरबताचा आस्वाद घेत होती . आम्ही मात्र नथांबता पुढचा प्रवास चालू ठेवला..

बराच वेळ पायपीट केल्यानंतर एका डोंगर माथ्यावर येऊन पोहचलो माथ्यावरून कलावंती आणि प्रभळगडाचे आकाशात जाणारे  सुळके स्पष्ट पणे दिसत होते. येथे कोपऱ्यावर एक झोपडी आहे ... झोपडी म्हणजे गुरांच्या  गोटयांसारखी बाजूला दोन तीन बसायला बाके टाकलेली . आणि झोपडी बंद होती... बाके बघताच  पाठीवरची ओजी टाकून बाकांवरच अंग टाकून दिल... आह्ह खूप बार वाटलं..  शहरातल्या AC लाफिकं पाडेल एवढा गारवा त्या झोपडीच्या आवारात होता. जवळपास ३० मिनटं झोपूनच गप्पा मारल्यानंतर , पाणी पिऊन गारेगार झालो , आणि फोटो सेशन करून पुन्हा पायपीट सुरु झाली ...
डोंगरावरची झोपडी. 

थोडं अंतर पार केल्यावर पाऊसात दुथडी भरून वाहणारा ओढा लागला... " माहिने आणि समीर" ने जुन्या ट्रेककिंगच्या आठवणींना थोडा उजाळा दिला आणि पुढे निघालो ...चालताना पाठीमागे दिसणारा कर्नाळाचा  सुळका.. पेब माथेरान ची डोंगर रांग अप्रतिम सोंदर्य !! हे सर्व कॅमेऱयात मी बंधिस्त करण्याचा केविलवाणी प्रयत्न माज्याकडून मी करत होतो ....बरेच वेळ चालल्यानंतर एक देऊळ लागलं देऊळ म्हणता येणार नाही एका मोट्या कातळा मध्ये "श्री"ची आणि "अंजनी पुत्र" यांची मूर्ती कोरलेली आणि त्याला शेंदूर फासलेला सर्वजण थापा टाकत मूर्तींचा पायथ्यचि सावळी खाली बसलो समोरच नजारा  म्हणजे भारीच !!!  "गणेशला आणि हनुमंतानं " नमस्कार करून पुढचा टप्पा चालू झाला...
दगडात कोरलेला मारुतीराया आणि गणेश . 
 परत आमची पायपीट चालू झाली . आम्ही माही पेक्षा बरेच सावकाश होतो... माही बोलता ३० मिनिटं सहज चालू शकत होता ... मग पुढे जाऊन तो आमची वाट बघत कुठे तरी एकटाच बसून निसर्गसोंदर्यत हरवून जायचा !!! आत्ता बराच वेळ चालतच होतो ... निसरड्या वाटी..  सह्यन्द्रीचा कुशीतले भले मोठे वृक्ष, पक्षी.. यांच्यातून वाटा काडत आम्ही कलावंतीण च्यापायथ्याशी वसलेल्या ठाकूरवाडी गावात येऊन पोहचलो ...हा भाग म्हणजे पूर्णपणे पठार समोरच काही अंतरावर शाळेसारखी बांधणी असलेलं घर पुढे अंगणात सारवून जमीन केलेली ... समोरचा भागात काही ट्रेकर्स ग्रुपने टेन्ट लावलेले होते ...घराचा पाठीमागे कलावंतीण आणि प्रबळगडाचा सुळका समोर कर्नाळा ...पेब  ...पूर्ण सह्यन्द्रीची अभङ रांग ...सर्व एकदम भारीच वाटत होत !
 आता थोडा वेळ घराच्या ओटी वर बसून अराम केला... समीर माहिने जेवणाबद्दल चौकशी केली आता इथे जेवन सांगून कलावंतीणचा सुळका सर करायचा असं ठरलं ...मग पाठीवरची ओजी कमी करावी म्हणून फक्त बॅग्स मध्ये पाण्याचा बॉटल्स घेऊन बाकीचं सामान घरातल्या मावंशीकडे सुपूर्द करून पुढे निघालो ...
ठाकूरवाडी गाव 
 आता पुढची वाट ठाकरांच्या वाडीतून जाते गावातली मंडळी कामामध्ये मग्न दिसत होती ..निसर्गाच्यासानिध्यात वाढलेली पोर मात्र मस्त पैकी पक्षानं बॅचकीने टिपण्यात मग्न होती..तर काहीजन  विटीदांडू खेळण्यात ... आम्ही पुढे निघलो तोच गावातल्या एका म्हातारं बाबानी आवाज देऊन दहा रुपयाची नोट मागितली मी खिशात हात घातला तर वीसची नोट निगली म्हातारबाबांचा हातात वीसची नोट पडताच .. म्हातारबाबाचं चेहरा खुलला .. आजोबांचा मायेने आशीर्वाद देत" बाबांनो सांभाळून जा आणि या सांगितले "  बरं वाटलं..
 आता पुढे कलावंतीण सुळका नजरेत दिसत असल्यानं सर्वानाच चालण्याचा हुरूप आला होता ... वाट थोडी उभी चढण असणारी आहे . १५ ते २० मिनटंनंतर आम्ही मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो ...हीच ती प्रसिद्ध खिंड ज्याच्यामधून सूर्य अस्थ ला जाण्याचा भास होतो ... आणि हाच नजारा पाहण्यासाठी माथेरानच्या सनसेट पॉईंट वर सर्वजण गर्दी करतात . उजवीकडे कलावंतिणीचा माथा डावीकडे प्रबळगडाचा माथा या मुळे दोगांमध्ये इंगर्जी व्ही आकाराचा भास होतो.  ठाकूरवाडीतील आदिवासी मंडळी याच सुळक्यावर पारंपरिक पद्धतीने शिमगा साजरा करतात .. 

बरीच ट्रेककर्स मंडळी माची उतरत होते महिलांचा सहभाग सुद्धा बऱयापैकी होता. ..पायथयशी एका झोपडी मध्ये ऐका मावशींनी काकडी आणि लिंबूसारबत विकत होत्या तिथे गावरान काकडीची मीठमसाला सोबत आस्वाद घेऊन आम्ही थोडा वेळ बसलो..माहिने सांगितले की आत्ता एका दमात  बुरुज पार करायचा ..पायथ्याशीच बसूनच सुळक्याच्या अंदाज आम्ही घेतला उंची एवडी वाटत नव्हती पण कातळात कोरलेल्या पायऱ्या यांची थोडी भीती वाटत होती ...आता आम्ही सुरवात केली ,घसरड्या वाटेवरून थोडं सांभाळून पुढे होत नंतर काळ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या सावधगिरी ने चडु लागलो ...एक फूट दीड तर कुठे दोन फुटाच्या कोरीव पायऱ्या ...येथे थोडं सावधगिरी जावं लागत कारण पुढे धरण्यासाठी काहीच आधार नाही आहे मजा वाटत होती आणि पायऱ्या बनवणारीची कमाल ... पायऱ्या पार केल्यावर बुरुजावर मोठा दगड लागतो ट्रेककिंचा भाषेत बोलायचं तर रॉकपॅच आता येते थोडी कसरत होणार होती  ...

दगडात कोरलेल्या पायऱ्या 
 कोणी भल्या माणसाने वरती चडण्यासाठी आधार म्हणून एक मोठास लाकूड दगडाच्या खाच्यामध्ये लावलेलं आणि अजून थोड्या अंतरावर अजून एक छोटं ...दोनीही खाच्या वर विश्वास ठेवून त्त्यावरून पाय ठेवून वरती जायचं होत .. चढण थोडं  सोपं झालं होतं ..समीर , प्रवीण त्या नंतर तन्मय ने थोडीशी कसरत करून पॅच पार केला नंतर माही आणि मी सुद्धा वरती आलो ...
 वरती आल्यावर मोहीम फत्ते झाल्याचा आनंद सर्वांचा चेहऱयावर होता... पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. जिच्या साठी हा बांधला तिच्या नावावरूनच या बुरुजाचे नाव पडले. शिखरावरून आपल्याला दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख दृष्टीस पडतो.अर्थात हे सगळं पाहायला वातावरण स्पष्ट असायला हवं. आणि अर्थातच आम्ही खूपच भाग्यवान होतो ...संपूर्ण परिसर अगदी स्पष्ट नजरेत होता..अप्रतिम !!!


टोकावरून दिसणारा पेब,कर्नाळा,इर्शाळगड आणि माथेरान
बराच वेळ बसल्यानंतर आत्ता आम्हला फक्त उतरायचे होते , तरीही या "फक्त" मध्ये बरेच काही होते ...तो रॉक patch उतरून परत सावधगिरीने आम्ही पायऱ्या उतरून पुढे चालू लागलो..उतरताना काही मंडळींनी ब्लूटूथ स्पीकर वर जोरानी इंग्लिशसॉंग्स लावलेले मग नेहमीप्रमाणे माझा भाषेतच शिव्या हासडून पुढे निगालो...हे निसर्ग सोंदर्य कॅमेरात साठवण्याचा प्रयत्न करत होतो पण ते कॅमेऱ्यात बंदीस्त करणे अशक्य समजल्यावर पुढे टोकावर एका दगडावर शांत पणे बसून आम्ही सर्वचजण आनंद अनुभवत होतो...बराच वेळ बसल्यावर आम्ही उतरण्याची तयारी केली एकदा फेसबुकवर live जाऊन मित्रानं पर्यंत गड सर केल्याची बातमी पोहचवली ....
रॉक पॅच 
चालताना मी प्रबळगडाच्या डाव्या बाजूच्या डोंगररांग कडे सहज डोकावले तर समोरच डोंगरात खोदलेली गुंफा मला दिसली एक माणूस वाकून जाऊ शकेल एवडीच अरुंद गुहेद्वारीच मारुतीरायची नक्षी काढलेली ... नंतर आतमध्ये जायचं कीनाही अस चलबिचल चाली होती शेवटी ... प्रवीण आणि माझ्यातली खाज म्हणून आम्ही दोघे आत मोबाइल टॉर्च घेऊन आत गेलो.. गुडग्यावर बसून  दोघे आत गेलो तीन ते चार  फुटानंतर परत उजवीकडे वळलो नंतर त्या पुढे जवळ पास ते जणसहज बसतील एव्हडी जागा आहे ..थोडाच वेळात टॉर्च बंद झाली मग तसच बाचकत आम्ही परत बाहेर आलो ..बहुतेक ती गुंफा शत्रू पासून वाचण्यासाठी किंवा दारू गोळा,  अन्न धान्य ठेवण्यासाठी करण्यात येतअसावी ...

प्रबळगडातली गुंफा 

जंगलातली निसरडी वाट तुडवत ठाकरांच्या वाडीत येऊन पोहचलो  उतरताना पोटातले कावळे ओरडत होते ..
घरातल्या आजोबांना विचारणा केल्यावर त्यानी जेवण तयार असल्याचं सांगितलं मग लाल रंग असलेल्या गडूळ पण स्वछ पाण्यातच हात थुऊण  जेवण यायची वाट बघत बसलो.. आजोबांनी जेवण आणलं माझ्या ताटात होत गरमागरम पिटल,भाकरी, चपाती, भेंडीची भाजी आणि बाकीच्या ताटात भाकऱ्या आणि मटणाचा रस्सया ... आता मात्र राहवत नव्हतं मी लिंबू पिळून एक घास तोंडात टाकला ...अप्रतिम चव !!! मग समीरच्या ताटातला मटणाचा रस्सा चाखला त्याची पण चव स्वादिष्ट ...गावी आजींनी बनवलेल्या  चुली वरच्या जेवणाची चव  ती हीच !!!समोरच निसर्ग परिसर न्याहळत आणि गप्पा मारत जेवण संपवलं ...

आता
थोडा आराम करायचा म्हणून आम्ही समोरच्या मोकळ्या जागेत गेलो ...मोकळी जागा म्हणजे खाली खोल दरी आणि नयनरम्य परिसर येतून सर्व दृश्य अगदी विहंगमय ! आता इथेच सर्व जण पाय सोडून वर आकाशाकडे नजर करून पडलो .कधी डोळा लागला समजला नाही .. वातावरण आभाळ भरून आलेलं..अंगावर पावसाचे काही थेंब पडत होते अत्ता कोणीच कोणासोबत बोलत नव्हत फक्त नितांत शांतता ..बहुतेक ह्याच साठी आम्ही सह्यन्द्रीचा कुशीत एवढ्या मुंबईचा गजबजलेल्या गर्दीतून आलो होतो .... जवळपास अर्धा तासाने कुठल्यातरी ट्रेकिंग ग्रुप मधल्या एक मुलाचा आवाज आला " मला ही अगदी तसच झोपायचं " निद्रा भंग झाली मागे वळून बघितलं त्याच बोट आमच्या पाच जणांकडे होत ...

आता
मात्र थोडा काळोख झाला होता आम्ही घाई घाईने उठून परत निघण्याची तयारी चालू केली.  जेवणाचा मोबातला आजोबांकडे देऊन धन्यवाद मानले  आणि सह्यन्द्रीची नयनरम्य दृश्य नजरेत साठवून आम्ही "आमच्या मुंबईकडे" प्रवास चालू केला ....



किल्याचे नाव : कलावंतीण माची  आणि प्रबळगड 

उंची : २३०० फिट 

जाण्याचा मार्ग : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी 

बघण्यासारखे : कलावंतीणचे शेवटचे टोक , प्रबळगड ची डोंगररांग , रात्रीमोकळ्या आभाळाखाली झोपण्याचा अनुभव, शिखरावरूनआपल्यालादिसणारे  दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख. 

आमचा कलावंतीण दुर्ग प्रवास विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकला नक्की भेट द्या ! 
https://www.youtube.com/watch?v=qJqhuVYbKSA

कुठल्याही माहितीसाठी नक्की संपर्क करू शकता 
अंकुश सावंत , कल्याण . 
+९१ ९७६८१५३११४

धन्यवाद !!!